एकीकडे १०० युनिटपर्यंत वीज मोफत तर दुसरीकडे इंधन समायोजन भार !

मुंबई - ठाकरे सरकार एकीकडे १०० युनिट पर्यंत वीज मोफत देणार असल्याची घोषणा करीत असली तरी दुसरीकडे बिलात जास्तीचा इंधन समायोजन भार टाकला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या  वीज बिलात वाढ होणार आहे. 

आधीच कोरोना विषाणूने जगभर हाहाकार माजवलेला असल्याने देशभरात आर्थिक मंदीचे सावट आहे. एकीकडे महागाईने उच्चांक गाठायला सुरूवात केलीये आणि त्यातच आता सर्वसामान्यांना वीजदरवाढीची झळ सोसावी लागणार आहे कारण महावितरणने ग्राहकांच्या बिलात जास्तीचा इंधन समायोजन भार टाकला आहे. 

राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने वीजभार वाढविण्याचा निर्णय घेतल्याने १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना आता ६१ रुपये, ३०० युनिट वीजवापरणाऱ्यांना ४११ रुपये तर ५०० युनिट वीज वापरणाऱ्यांना ६८५ रुपये जादा मोजावे लागतील. यापूर्वी जानेवारीच्या वीज वापरासाठीही ५५ पैसे ते १.४० पैसे प्रति युनिट असा इंधन समायोजन आकार लावण्यात आला होता, परंतु  आता पुन्हा वीजबिल भार लावण्यात आला असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

राज्यात महावितरणचे जवळपास दोन कोटी ५५ लाख वीजग्राहक आहेत. त्यांना आताच्या वाढीव वीजबिलाचा भार पडणार आहे. महावितरणच्या ग्राहकांवर मार्च महिन्यात पुन्हा इंधन समायोजन आकारापोटी वाढीव वीजबिलाचा भार पडणार आहे. फेब्रुवारीच्या वीजवापरापोटी घरगुती ग्राहकांवर प्रति युनिट ६१ पैसे ते १.६२ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे.

 दरम्यान, मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्णच राज्यात  वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे अडीच कोंटीपेक्षा जास्त वीजग्राहक आहेत, म्हणजेच महावितरणची वीज वापरण्याची संख्या सर्वाधिक आहे. नोव्हेंबरमध्ये वीजखरेदीसाठी झालेल्या जादा खर्चाचा ताळमेळ बसावा म्हणून हा अधिकचा इंधन समायोजन आकार ग्राहकांच्या माथी मारण्यात आला आहे.  त्यामुळे ग्राहकांना आता यापुढे वाढीव वीजबिल येणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post