महाराष्ट्र्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६

मुंबई : जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायसर  महाराष्ट्रात पाय पसरू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या 26 वर गेली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यापैकी पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण आढळले आहेत.

नव्या आकडेवारीनुसार एकूण 94 रुग्ण देशभरात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्र 26, केरळ 19, हरियाणा 14 (सर्व परदेशी नागरिक), उत्तर प्रदेश 12, दिल्ली 7, कर्नाटक 6, राजस्थान 3, पंजाब 1, जम्मू काश्मीर 1, लडाख 3, तामिळनाडू 1, तेलंगणा 1 यांचा समावेश आहे.

राज्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील शाळा बंद राहणार आहेत. या शाळा आणि महाविद्यालय मात्र शहरी भागातील आहेत, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला नसल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू असतील. शाळांसोबतच अंगणवाड्याही बंद राहतील आणि आयटीआय कोर्सेसदेखील बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद 

 राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.

राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.

राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने