जयसिंगराव गायकवाड यांची भाजपला सोडचिठ्ठी

 



बीड - भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ आणखी एक माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेले माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपला राजीनामा  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.


माजी मंत्री  जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.

जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यापूर्वी त्यांनी केंद्र आणि राज्यात काम केले आहे. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्या जाण्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते.

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. यामध्ये आता जयसिंगराव गायकवाड यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.एकीकडे महाआघाडीत एकजूट तर भाजपमध्ये नाराजी नाट्य  रंगत असल्याने भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर अडचणीत आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post