निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी

सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाला अखेर  न्याय मिळाला !


नवी दिल्ली : सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे. या खटल्यातील चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. दिल्लीच्या तिहार तुरूंगात मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या नराधमांना आज (20 मार्च) पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आलं.  एकाच वेळी चारही दोषींना फाशी देण्याची ही जेलच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

तिहार कारागृहात चारही दोषींच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांनी मृत्यूची पुष्टी केली. हरिनगरमधील दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात या चार मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल. डॉक्टरांचे पॅनेल पोस्टमॉर्टम करेल. जेलबाहेर लोक मिठाई वाटून जल्लोष करत आहेत.

याबाबत निर्भयाच्या आई म्हणाल्या की दोषींना फाशी दिल्यानंतर महिला सुरक्षित वाटतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी विनंती करू जेणेकरून अशा प्रकरणांमध्ये कोणीही दिरंगाईची रणनीती स्वीकारू नये.

निर्भयाची आई म्हणाली- लढा सुरूच ठेवेल

  निर्भयाची आई म्हणाली, आमची मुलगी आता जिवंत नाही आणि परत येणार नाही. जेव्हा ती आम्हाला सोडून निघून गेली तेव्हा आम्ही हा लढा सुरु केला. हा संघर्ष तिच्यासाठी होता, परंतु आम्ही भविष्यात आमच्या मुलींसाठी हा लढा सुरूच ठेवू. मी माझ्या मुलीचे चित्र मिठी मारले आणि म्हणालो की तुला शेवटी न्याय मिळाला.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण ?

- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.

- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.

- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.

- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.

- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post