संजय राऊत पुन्हा नाराज !

मुंबई : दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र मी नाराज नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

रश्मी ठाकरे यांना संपादक बनवण्याचा निर्णय कौटुंबिक आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला कार्यकारी संपादक बनवलं होतं. त्यामुळे माझं काम भक्त प्रल्हादाप्रमाणे आहे. भक्त प्रल्हादाप्रमाणे माझं स्थान मोठं किंवा लहान नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे याआधी सामनाचे संपादक होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना सामनाच्या संपादकपदी राहणं अडचणीचं ठरत होतं, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी संजय राऊत यांची संपादकपदी वर्णी लागेल, असं म्हटलं जात होतं. मात्र रश्मी ठाकरे यांची संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामनाच्या पहिल्या पानावर रश्मी ठाकरेंना संपादक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या जागी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सामनाच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाहीये. सामना वृत्तपत्राच्या संपादकपदाला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्या परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर या पदावर योग्य व्यक्तीची निवड करणे हा सामूदायिक निर्णय आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

सामनाचे खरे जनक कोण ?
सामना या वृत्तपत्राचे मूळ मालक आणि संपादक माढा येथील पत्रकार वसंत कानडे होते. १९८९ मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक काढण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा सामना हे नाव त्यांना हवे होते. त्यामुळे कानडे यांच्याकडून हे टायटल विकत घेण्यात आले. बाळासाहेबांनी 23 जानेवारी 1989 मध्ये सामना वृत्तपत्राची  मुंबई येथून नव्याने सुरुवात झाली. सामनातून शिवसेनेची राजकीय भूमिका आणि विचार मांडले जातात. सामनाचे अग्रलेख नेहमीच चर्चाचा विषय असतात. सध्याचे अग्रलेख कार्यकारी संपादक संजय राऊत स्वत: लिहितात.

Post a Comment

Previous Post Next Post