कोरोना : चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, राज्य शासनाकडून खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडियावर  चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.

यासंदर्भात विधानपरिषदेत सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले की, राज्यशासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या 551 आंतरराष्ट्रीय विमानातील 65 हजार 121 प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून 401 प्रवाशी आले असून आतापर्यंत 152 प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी 149 लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 143 जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 30 जहाजांमधील 676 प्रवाशांची तपासणी केली त्यात संशयीत रुग्ण आढळून आला नाही. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार चीनसह 12 देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आता मात्र सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला स्वघोषणापत्र देणे  सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे.

देशात सध्या केरळ, दिल्ली आणि तेलंगणा येथे अनुक्रमे तीन व प्रत्येकी एक असे पाच रुग्ण स्थानिक रुग्णालयांनी केलेल्या चाचणीनुसार पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. मात्र पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post